Views



*खरीप हंगाम 2021 मधील पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात यावी -- भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

खरीप हंगाम 2021 मधील पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी तहसीलदार संतोष रूईकर व तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगाम 2021 मधील पिक विमा भरण्यासाठी विमा कंपनी व शासनाने दि.15 जुलै 2021 रोजी अंतीम तारीख दिली आहे. परंतु हि तारीख अंत्यत कमी कालावधीची असल्याने व पाऊस उशीरा झाल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी मोठा विलंब झाला आहे. शेतकऱ्यांना गतवर्षीचा पिक विमा अतिवृष्टी होऊन मोठे नुकसान झाले असतानाही विमा कंपनीच्या व राज्य सरकारच्या मनमानी व नियोजनशुन्य कारभारामुळे आजतागायत लोहारा तालुक्यातील हजारों शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. पिक विमा न मिळाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे गतवर्षी चा पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांना देण्यासाठी विना कंपनीने व शासनाने शेतकऱ्यांचे हित जोपसण्यासाठी तात्काळ पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना खात्यावर जमा करावी. पिक विमा न मिळाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी यंदा बँक, खाजगी सावकार, बचत गट, व इतर माध्यमातून कर्ज काढून बी-बियाणे खते खरेदी करून पेरणी केलेली आहे. पिक विमा भरण्यासाठी यंदा विमा कंपनी व सरकारने दिनांक 15 जुलै 2021 रोजी अंतिम तारीख दिली असली तरी सतत इंटरनेट सेवा विस्कळीत होणे, सर्वर डाऊन होणे, साइड न चालणे, यासह आदी कारणामुळे आज रोजी हजारो शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे पिकांचे संरक्षण होणे आवश्यक असल्याने पिक विमा भरणे प्रत्येक शेतकऱ्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे पिक विमा कंपनी व सरकारने शेतकऱ्यांना पिक विमा भरण्याची मुदत वाढवून द्यावी. पिक विमा भरण्यासाठी मुदत न वाढवून दिल्यास शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लोहारा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, राजेंद्र कदम, उपस्थित होते.
 
Top