Views


*कोरोना हॉटस्पॉट गावातील सर्व लोकांची तपासणी करावी - पालकमंत्री*

*कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक औषध खरेदीला साडेसहा कोटीचा निधी मंजूर....*


*उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)*
   
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. उस्मानाबाद जिल्हा व महाराष्ट्र राज्याचा सध्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यू दर समान असून उस्मानाबाद जिल्ह्याचा हा मृत्युदर दीड टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकराव गडाख यांनी दिले.
  कोरोना संदर्भात येथील सर्कीट हाऊस मध्ये बुधवारी (दि.16) सायंकाळी पालकमंत्री गडाख यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, आ. सुजितसिंह ठाकूर, आ. राणा जगजितसिंह पाटील, आ. विक्रम काळे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर , निवासी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डि.के.पाटील, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रकाश खापर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी हनुमंत वडगांवे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे आदी उपस्थित होते.
   पालकमंत्री गडाख पुढे म्हणाले की, ऑक्टोबर अखेरपर्यंत कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे संकेत मिळत असल्याच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने  अधिक प्रभावी उपाययोजना राबवून  कोरोनाचा प्रतिबंध करावा . सध्या जिल्ह्यात राज्या एवढाच मृत्यूदर(2.87%) आहे. तर हा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर दीड टक्क्यापर्यंत खाली येण्यासाठी उपाय योजना कराव्यात, अती गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. ते नियंत्रणात आले पाहिजे. जिल्ह्यात 60 वर्ष वयावरील 141 रुग्णांचा संसर्गाने  मृत्यू झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
 जिल्ह्यात कोविड-19 च्या चाचण्या वाढवल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पाच ते सात गावे हॉटस्पॉट आहेत. हॉटस्पॉट असलेल्या गावातील सर्व लोकांची चाचणी करण्याचेही निर्देश श्री गडाख यांनी दिले. कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी सध्या तीन औषधांची गरज असून त्यासाठी साडेसहा कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्याचे पालकमंत्र्यांनी मान्य केले. जिल्ह्यातील कोरोना रुग्णासाठी ऑक्सिन, व्हेंटीलेटरची उपलब्धता करुन देण्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ग्रामीण भागात सरपंच, ग्रामसेवकाडून प्रमाणपत्र दिल्यास संबंधीत  रुग्णास होम क्वारंटाईन करण्यात येत आहे.शहरी भागातही होम आयसोलेशनची सुविधा देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
    जिल्ह्यात साधारणपणे 48 ते 50 गावे हॉटस्पॉट असून त्यात उस्मानाबाद शहरासह तेरखेडा, उमरगा, तुळजापूरचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रातच अ‍ॅन्टीजेन चाचणीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असून परंडा, भूम, मध्ये चांगले कॉन्टक्ट  ट्रेसिंग होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने बैठकीत दिली.
आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी पालकमंत्री ना.शंकरराव गडाख यांच्याकडे केलेल्या मागण्या...

➤जिल्ह्यातील कोविड-१९ ने बाधित रुग्णांची संख्या  पाहता दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच गंभीर बनत आहे. ग्रामीण भागात देखील याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असून अशा परिस्थितीत २५० रुग्णांसाठी उभारलेल्या कोविड रुग्णालयात अपेक्षित स्टाफ च्या तुलनेत केवळ ३०% स्टाफ उपलब्ध आहे.अनेक रुग्णालयात ऑक्सिजन ची कमतरता भासत आहे. एवढेच नव्हे तर उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयातील पी.एम केयर्स फंड (PM Cares Fund )च्या माध्यमातुन उपलब्ध झालेले सर्व व्हेंटीलेटर अद्याप उपयोगात आणले गेले नाहीत.

➤जिल्हाभरातुन रुग्ण,त्यांचे नातेवाईक व सामान्य नागरिकांच्या  चाचणी(टेस्टिंग),रुग्णांच्या संपर्कात आलेले रुग्ण शोधने (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग), विलगिकरण (आयसोलेशन), कोविड केयर सेंटर व रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचाराबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. या बाबी अत्यंत चुकीची असून नागरिकांच्या जीविताच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेत असलेल्या त्रुटी त्वरित दूर करणे आवश्यक आहेत.


➤तरी आपण कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता  जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी खालील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करून त्यांची सोडवणूक करावी ही विनंती.


१) जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करून गतिमान करण्यासाठी एक अनुभवी व कृतीशिल जेष्ठ अधिकारी नियुक्ती करण्याबाबत आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे साहेबांकडे मागणी केली होती.त्याला अनुसरून त्यांनी औरंगाबाद स्थित डॉ.गोवर्धन गायकवाड यांना नियुक्त केले होते मात्र त्यांनी सुरुवातीचे ८-१० दिवस वेळ दिला त्यांनतर ते उपलब्ध नाहीत.गेली ४० दिवस जिल्ह्यात जेष्ठ,अनुभवी अधिकारी नाहीत.प्राप्त परिस्थिती पाहता तातडीने एक कृतिशील अनुभवी अधिकारी नेमणे.

२) चिकित्सक, भुलतज्ञ, आसीयु तज्ञ तात्पुरत्या स्वरुपात प्रतिनियुक्तीवर नेमणे.

३) सध्या कार्यरत असलेले डॉक्टर्स सेवेसाठी उपलब्ध ठेवणे व त्यांच्या कामात सुसूत्रता आणणे.

४) तज्ञ डॉक्टर्स ची कमतरता पाहता जिल्हा रुग्णालय,  येथील आय.सी.यु मध्ये टेलमेडिसीन प्रणालीची सुविधा  सुरू करून बाहेरील तज्ञांची मदत घेणेबाबत आम्ही जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना ३ सप्टेंबर रोजी अवगत केले असून याबाबत त्यांच्यासोबत चर्चा चालू आहेत,याविषयी अंतिम निर्णय घेऊन ही सेवा तातडीने सुरू करणे.

५) किमान सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड-१९ रूग्णांना तरी रेमडेसिवीर औषध उपलब्ध करून देणे.
 
Top