Views


जवळगा बेट येथील निलेश गायकवाड यूपीएससी मध्ये यशस्वी

लोहारा:-( इकबाल मुल्ला)
भारतीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवा परीक्षेत उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील निलेश श्रीकांत गायकवाड हे राष्ट्रीय पातळीवर 752 व्या क्रमांकांने उत्तीर्ण झाले आहेत. या त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. ते आयआयटी, मुंबई येथून केमिकल इंजिनीरिंगची बी. टेक.आणि एम.टेक.पदवी मिळविली आहे. गॅलॅक्सि सरफेक्टन्स लिमिटेडमध्ये त्यांनी इंटर्नशिप केली. त्यानंतर बेंगलोर येथे झीनोव्ह कंन्सलटन्सी कंपनीमध्ये सहयोगी कंन्सलटन्ट म्हणूनही सेवेत असताना त्यांना आपल्या कार्याच्या मर्यादा लक्षात आल्या आणि त्यानंतर ते युपीएससीकडे वळले. नेतृत्ववृत्ती हा त्यांचा विशेष गुण असल्याने त्यांनी आयआयटीमध्ये शिक्षण घेताना ते जनरल सेक्रेटरीपदी निवडून आले होते. ते  विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी विविध स्पर्धामध्ये सहभाग घेतला होता यामध्ये निबंध, कथाकथन, वादविवाद, वक्तृत्व, चित्रकला, रंगभरण, प्रश्न मंजुषा, एकपात्री अभिनय, एनसीसी, वैज्ञानिक प्रयोग यामध्ये हिरीहिरीने पुढाकार घेऊन विविध बक्षीसे मिळविली. त्यांनी राष्ट्रीय व महाराष्ट्र पातळीवरील प्रज्ञा शोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, डॉ.होमी भाभा वैज्ञानिक परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षा, स्वयं अध्ययन परीक्षा, सामान्य ज्ञान परीक्षा, गणित आदी विषयातील पूर्वप्रथमा, प्रथमा, द्वितीया, प्रबोध, सुबोध परीक्षा, इंग्रजी विषयातील एन्टरन्स, प्रायमरी, इंटरमेडियट, अड्वान्सड परीक्षा, हिंदी विषयातील नागरी बोध परीक्षा, अखिल भारतीय संस्कृत ज्ञान परीक्षा यामध्ये विशेष प्राविण्य मिळविले आहे. आकाशवाणी केंद्रावरुन त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रसारीत झाले आहेत. अटल बिहारी वाजपेयी संस्था, मनाली येथून त्यांनी बेसिक माऊंटरिंग कोर्से केला आहे. त्यांचे वक्तिमत्व बहुगुणी, अष्टपैलू स्वरूपाचे आहे. त्यांनी ज्या-ज्या विविध क्षेत्रातील कामावरून ते यशस्वी झाल्याचे लक्षात येते. सातत्यपूर्ण अभ्यासाने मिळू शकते हमखास यश. आपली इच्छाशक्ती, आत्मविश्वास, चिकाटी यामधून आपल्यातील उर्मी वाढते. निश्चित संकल्प, योग्य मार्गदर्शन, झोकून देऊन मेहनत करण्याची तयारी, सूक्ष्म नियोजन त्यानुसार सातत्यपूर्ण अभ्यास केल्याने यश हमखास मिळू शकते. त्यासाठी योग्य प्रकारची रणनीती आखावी लागते. एकदा का आपण यशस्वी झालो की, आयुष्यभर मानसन्मान, प्रतिष्ठा मिळते. समाजाचे देणे देता येते, समाजासाठी काही करता येते असे त्यांची भूमिका राहिली आहे. यशाचे गमक कठोर परिश्रम आहे. प्रशासकीय सेवेत रूजू होण्याचा एक महत्पूर्ण राजमार्ग युपीएससी परीक्षा असली तरी त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागते, हे मात्र खरे. या परीक्षेत चालू घडामोडींचे सूक्ष्मज्ञान, सामान्यज्ञान तपासले जाते. सामान्यज्ञान हे चालू घडामोडींवर आधारीत असल्याने ते अद्यावत ठेवणे महत्वाचे आहे. त्याअनुषंगाने परीक्षेशी संबंधीत संदर्भ साहित्याचा अभ्यास करणे, प्रश्नसंच सोडविण्याचा सराव करणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. महत्वकांक्षेचा प्रेरणादायी प्रवास असेच म्हणता येईल. स्पर्धा परीक्षेची काठिण्य पातळी वाढत आहे. त्याचे कारण म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये होणारी वाढ होय. अशा स्तिथीत केवळ शासकीय नोकरी, बंगला, गाडीचे नुसते आकर्षण असून चालत नाही तर त्यासाठी आपल्या महत्वकांक्षेला योग्य दिशेने गती देता आली पाहिजे असे त्यांनी सांगितले. आपण अभ्यासात लक्ष केंद्रित करावयास हवे. सातत्यपूर्ण अभ्यास करूनही प्रसंगी अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून खचून जाता कामा नये. आपल्यातील उणिवा शोधून त्यात सुधारणा करणे, उत्तर आपणच शोधणे, सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन नव्या जोमाने अभ्यासाला लागणे गरजेचे असते असे शेवटी आमच्या प्रतिनिधीशी चर्चा करताना त्यांनी सांगितले. माजी प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड यांचे ते ज्येष्ठ सुपूत्र आहेत.
 
Top