Views


*''आजादी का अमृत महोत्सव'' अंतर्गत मौजे भाटशिरपुरा, ता. कळंब याठिकाणी विधी साक्षरता शिबीर संपन्न...*


कळंब/प्रतिनिधी

    तालुक्यातील मौजे भाटशिरपुरा या ठिकाणी दिनांक ०२ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत साजरा होत असलेल्या ''आजादी का अमृत महोत्सव'' अंतर्गत भारतभर जागरूकता व पोहोच कार्यक्रम (Pan India Awareness and Outreach Programme) च्या अनुषंगाने महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती कळंब व ग्रामपंचायत भाटशिरपुरा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ऑक्टोबर, २०२१ रोजी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांचेमार्फत असंघटित क्षेत्रातील कामगार वर्गांसाठी असलेल्या योजनेबाबत विधी साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
 सदरील शिबीरामध्ये तालुका विधी सेवा समिती येथील कनिष्ठ लिपीक श्री. इरफान मुल्ला यांनी असंघटित क्षेत्रातील कामगार वर्गासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे अशा शिबिरातून विविध योजनांची तसेच कायदेशीर बाबींची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शिबिरांचे आयोजन केले जात असल्याचे सांगून सदरील शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच पंचायत समिती कळंब येथील ग्रामसेवक श्री. अमोल सरवदे यांनी पंचायत समिती मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती ग्रामस्थांना दिली.
सदरील कार्यक्रमाचे सूत्र संचलन व आभार प्रदर्शन उपसरपंच सूर्यकांत खापे यांनी केले. सदरील विधी साक्षरता शिबीरासाठी मौजे भाटशिरपुरा गावच्या सरपंच सुनिता दिलीप वाघमारे, कळंब न्यायालयातील कनिष्ठ लिपिक समाधान राखुंडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भाटशिरपुरा येथील ग्रामसेवक एस. व्ही. पोटे, ग्रामपंचायत ऑपरेटर रमेश उळगे यांनी परिश्रम घेतले.
 
Top