Views



*मनात नैराश्य आणु नका, चांगुलपणाच्या पाठीमागे नेहमी समाज उभा असतो - माजी आयएएस अधिकारी श्याम देशपांडे, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी शांतीदुतचे परिसंवाद*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

श्रम व परिश्रमाच्या आधारे ध्येय गाठता येते. विद्यार्थ्यांमध्ये नेहमी आत्मबल जागृत असणे आवश्यक आहे. मनात नैराश्य आणु नका, चांगुलपणाच्या पाठीमागे नेहमी समाज उभा असतो. प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधार कांही काळापुरताच असुन प्रत्येकाची पहाट होणार आहे असे मत माजी आएएएस अधिकारी श्याम देशपांडे यांनी व्यक्त केले.
शांतिदूत परिवारच्या विद्यार्थी, कला-क्रीडा व साहित्य विभागाच्या वतीने आयोजित 'स्पर्धा परिक्षा व विद्यार्थ्यांचे मनोबल' या ऑनलाईन परिसंवादात ते बोलत होते. 
महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक तथा शांतीदुतचे मार्गदर्शक डॉ. विठ्ठलराव जाधव अध्यक्षस्थानी होते. माजी जिल्हाधिकारी श्याम देशपांडे, मिशन आयएएसचे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे (अमरावती), यशवंत शितोळे, संदीप जोशी, प्रा. युसुफ मुल्ला, योगेश जाधव, अनिता राठोड, महेश जगताप आदींची यावेळी उपस्थिती होती. आवडीपेक्षा आपल्या ध्येयाची ओढ आवश्यक आहे. आपले कौशल्य यश संपादन करण्यासाठी वापरा. शारीरीक व मानसीक आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.विठ्ठलराव जाधव यांनी केले. रोज एक रुपया नाममात्र फिस घेऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचे ज्ञान देणाऱ्या मिशन आयएएसचे संचालक प्रा.डॉ. काठोळे यांनी विद्यार्थ्यांनी जिद्द न सोडता आपली ध्येयपुर्ती करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करून कधीही अडचण आल्यास माझ्याकडे या मी मदतीसाठी सदैव तयार असल्याचे सांगितले. यशवंत शितोळे यांनी युवकांनी स्वतःला अपडेट राहावे असे सांगुन आपण आत्मसात केलेले ज्ञान हे जगण्याचे सामर्थ्य देते असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्रा.डॉ.काठोळे व सुत्रसंचलन संदीप जोशी यांनी केले तर आभार प्रा.युसुफ मुल्ला यांनी आभार मानले. यासाठी योगेश जाधव, अनिता राठोड, महेश जगताप आदींनी पुढाकार घेतला. यावेळी राज्यातील शेकडो स्पर्धा परिक्षार्थी व विद्यार्थ्यांनी परिसंवादाला उपस्थिती लावली.
 
Top