Views



*जागोजागी अडवणुक केलेल्या सर्व वारकऱ्यांना सन्मान पुर्वक मुक्त करुन त्यांच्यावर लावलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे -- विश्व हिंदू परिषद बजरंग दल*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

जागोजागी अडवणुक केलेल्या सर्व वारकऱ्यांना सन्मान पुर्वक मुक्त करुन त्यांच्यावर लावलेले सर्व गुन्हे शासनाने तात्काळ मागे घेण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन लोहारा विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, जे मुघलांना जमले नाही ते तुम्ही करुन दाखवले. महाराष्ट्राची भुमी ही साधु संतांची महान परंपरा लाभलेली पुण्यभुमी आहे. याच परंपरेतील वारी हा वारकरी संप्रदाय व वारकऱ्यांच्या उपासनेचा व महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. शेकडो वर्षांची पायी वारीची ही परंपरा मोगलांच्या तसेच इंग्रजांच्या काळात ही अबाधित होती. परंतु गेल्या वर्षी कोरोना संक्रमणामुळे पायी वारीची परंपरा खंडित झाली. पारतंत्र्यात किंवा स्वतंत्र भारतात उपासने करीता कधीही कोणतीही परवानगी घेण्याची गरज भासली नाही. किंवा धर्म सत्तेने कधी राज्य सत्तेकडे तशी परवानगीही मागितली नाही. देशात सर्वत्र जनजीवन सामान्य होत असताना हॉटेल्स, मॉल्स, दारूची दुकाने, बाजार पेठा, लग्न समारंभ, सरकारी जाहीर कार्यक्रम सर्रास सुरू आहेत. त्यात विना मास्क फिरणाऱ्या शेकडो हजारोंच्या गर्दी होत आहे. लोक हवे ते ते मुक्त प्रवास करत आहेत. असे असताना वारकऱ्यांच्या उपासनेच्या या मूलभूत अधिकारावर गदा का आणण्यात येतात. महाराष्ट्रात मुबलक लसीकरणा द्वारे कोरोना परिस्थिती नियंत्रणात असताना वारीला विरोध का करण्यात येत आहे. कोरोना संक्रमणाचे सर्व नियम पाळून ही सर्व बंधने फक्त वारकऱ्यांवर का लादली जात आहेत. 700 वर्षाची पायी परंपरा आहे. यावर्षी तुकाराम महाराजांचा 366 वा पालखी सोहळा आहे. संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानदेव महाराज, संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, या प्रमुख संतांच्या पालख्या सह इतर पूजनीय संताच्या पालख्या ही पंढरपुरात दाखल होत आहेत. मानाच्या प्रत्येक पालखीसोबत किमान 40 ते 50 वारकऱ्यांना पायी वारी करण्याची परवानगी द्यावी. ह्यात फक्त दोन्ही डोस पूर्ण झालेल्यानाच कोरोनाचे नियम पाळून RTPCR तपासणी करून प्रवासाची परवानगी द्यावी. सकाळी पावसात अडचण असल्यास वारकरी वारीचा प्रवास रात्रीचा करतील संक्रमणाचा धोका असल्यास वारकरी गावात न जाता गावाबाहेर माळरानावर मुक्काम करतील. विविध स्तरावरील झालेल्या बैठकीत वारकऱ्यांच्या असे निदर्शनात आले आहे. शासनाने प्रशासनाने वारकऱ्याच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. प्रत्यक्ष बैठकीत झालेली चर्चा व त्यानंतर काढलेल्या अध्यादेशात प्रचंड तफावत आढळून आली. सरकारने वारकऱ्यांना चर्चेला बोलावून त्यांची दिशाभूल केली आहे. विविध सरकारी जाहीर कार्यक्रमात तसेच पालकमंत्र्यांच्या दौर्‍यात जमणाऱ्या कार्यकर्त्यांची टेस्ट करण्यात येते का, पंढरपुरात झालेल्या मतदान प्रकियेच्या प्रचार सभांना कोरोना ची नियमावली लागू होत नव्हती का, कोरोना फक्त आषाढी-कार्तिकीच्या वारीतच वाढतो आणि वारकऱ्या मार्फतच पसरतो का, सरकारचा वारी विरोध म्हणजे सरकारने अस्मानी संकटाचा फायदा घेत पोलिस प्रशासनाच्या बाळाने वारकरऱ्यांवर जाणीवपूर्वक केलेली सुलतानी अत्याचार आहेत. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांना केलेली अटक त्यानंतर फसवून केलेली त्यांची नजर कैद हा त्याचाच एक प्रकार आहे. भररस्त्यात वारकऱ्यांची पारंपारिक गणवेश उतरवायला लावून हिंदुत्वाचे व महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या भागवत धर्मीय पताका ची अवहेलना करुन आदरणीय हरिभक्त पारायण निरपराध संतांना अटक करून त्यांना अपराध्याची वागणूक देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची तात्काळ माफी मागितली पाहिजे. जागोजागी अडवणूक केलेल्या सर्व वारकरऱ्यांना सन्मानपूर्वक तात्काळ मुक्त करावी व त्यांच्यावर लादलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, तसेच लवकरात लवकर सरकारने वारकऱ्यांच्या मागण्यांचा निर्णय न घेतल्यास येत्या काळात महाराष्ट्रव्यापी आंदोलनाचा इशारा निवेदनात दिला आहे. या निवेदनावर बालाजी चव्हाण, महेश कुंभार, राजेंद्र पाटील, शिवशंकर हतरगे, इकबाल मुल्ला, युवराज जाधव, सोमनाथ कारभारी, शिवाजी पवार, संतोष पाटील, यांच्या सह्या आहेत.
 
Top