Views



डॉ.किरणकुमार बोंदर यांचे छायाचित्र



*सर्वसामान्य कुटुंबातील पोर बनले विभागीय 
सहसंचालक*




कळंब :-(प्रतिनिधी)

मनामध्ये जिद्द ,अथक परिश्रम करण्याची तयारी असेल तर कठीण गोष्ट शक्य करून दाखवण्याची क्षमता काही लोकांमध्ये असते, त्यातील एक डॉ.किरणकुमार बोंदर हे कळंब तालुक्यातील देवधानोरा या गावचे रहिवासी.

त्यांचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं. पुढे माध्यमिक शिक्षणासाठी महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा या ठिकाणी गेले. त्याठिकाणी त्यांनी वसतिगृहात राहून शिक्षण घेतले. ते मन लावून अभ्यास करत असत. त्यांनी स्वतः ची गुणी विद्यार्थी म्हणून शाळेत ओळख निर्माण केली . विद्यार्थीदशेत आपण ज्ञान घेतलं पाहिजे. आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे,हे संस्कार लहानपणीच मनात रुजलेले. पुढे ते उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी कळंब येथील मोहेकर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथेच विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केली.पदव्युत्तर पदवीसाठी औरंगाबाद गाठलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये गणित विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. 

या काळात 'कमवा व शिका'या योजनेत काम करून आणि खाजगी शिकवणी घेऊन स्वतःचा शिक्षण खर्च करत असत. कोणत्याही परिस्थितीत शिक्षण सोडायचे नाही. शिक्षण घेणे हा ध्यास मनी बाळगला होता. त्यावेळी त्यांनी बीएड,एम. एड. चे शिक्षणही पूर्ण केले. मिलिंद ज्युनिअर कॉलेज परळी येथे ज्युनियर प्राध्यापक म्हणूनही सेवाही केली. त्यानंतर २०२० ते २०१८ या कालावधीत सायन्स कॉलेज नांदेड येथे वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवाही केली. नांदेड येथे वरिष्ठ महाविद्यालयात नोकरी करत असताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून गणित विषयात 'विद्यावाचस्पती' (पीएच.डी.) ही पदवी प्राप्त केली.

 त्याच कालावधीत गणित विषयात सेट परीक्षाही उत्तीर्ण केली . नाविन्यपूर्ण गोष्टी करता येतील का ? हा विचार कायमस्वरूपी त्यांच्या मनामध्ये असायचा.नुसती स्वप्ने पाहून चालत नाही ,याची त्यांना जाणीव होती.ती स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते ,ते गुण उपजत लहानपणापासून अंगी बाळगून होते. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत नामनिर्देशनाने अमरावती येथील शासकीय ज्ञान,विज्ञान विदर्भ संस्था येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून मध्ये रुजू झाले.त्यांची १९ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाने सहसंचालक, उच्च शिक्षण,सोलापूर येथे नियुक्ती करण्यात आली.

आपण जे कार्य हाती घेतले आहे, त्यामध्ये आपण मनापासून, प्रामाणिकपणे कर्तव्य करीत राहिलो तर नक्कीच आपल्याला यश मिळते. हा आदर्श सरांच्या जीवनप्रवासातील वाटचालीतून दिसून येतो.मी ग्रामीण भागातील आहे,माझी परिस्थिती चांगली नव्हती.शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत.असं कोणतंही कारण यशस्वी व्यक्तीला अडवू शकत नाही.हाच संदेश सरांच्या जीवन प्रवासातून दिसून येतो.या यशामध्ये आई प्रमिला लक्ष्मण बोंदर यांचे योगदान अविस्मरणीय आहे, त्याचबरोबर आजोबा, चुलते, मामा,मावशी,काका, भाऊ, बहीण, इतर नातेवाईकांचे व विशेषतः मित्रपरिवाराचे सहकार्य महत्वपूर्ण ठरते . ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील डॉ.किरणकुमार बोंदर यांचा जीवनप्रवास नक्कीच आदर्शवत व इतरांना प्रेरणादायी ठरणारा आहे. 
-----------------------------------------
-----------------------------------

 
Top