Views




*राज्याचे मंत्री देशमुख,बनसोडे यांच्यासह खा.शरद पवार यांनी नुकसान ग्रस्त भागाची केली पाहणी संबधितांना पंचनामे करण्याचे दिले निर्देश...*

उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)

उस्मानाबाद(दि. १८)अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या पिकासह  काढून ठेवलेल्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच गुरे ढोरे व घरे पडून घरातील संसारोपयोगी साहित्य देखील वाहून गेले आहे. अतिवृष्टी, दुष्काळ व रोगराई यामुळे  जे नुकसान होते ते वर्षभरासाठी होत असते. मात्र या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांबरोबरच शेतातील माती देखील वाहून गेलेली  असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना पुन्हा शेती वाहीत करण्यासाठी किमान पाच ते सात वर्षे लागतील. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी आपत्ती असून अशा वाईट व अडचणीच्या काळात शेतकऱ्यांनी धीर धरावा. आम्ही निश्चित शेतकऱ्यांना व गावांना उभे करण्यासाठी धोरण ठरवून त्यांना नक्कीच मदत मिळवून देण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यामातून प्रयत्न करू असे प्रतिपादन  माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांना संबोधित करताना केले.
 खा. शरद पवार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, लोहारा व उमरगा  तालुक्यातील अवकाळी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पाहणी केली. 
प्रारंभी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मागील तीन-चार दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी 163 मिलिमीटर पाऊस झाल्याचे सांगून उमरगा तालुक्यात मागील पाच दिवसात 235 मिलिमीटर तर लोहारा तालुक्यात 200 तुळजापूर तालुक्यात 212 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती दिली जिल्ह्यातील 42 महसूल मंडळापैकी 15 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली असून उर्वरित महसूल मंडळात पूर परिस्थितीमुळे पिके वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. 
     तसेच जिल्ह्यातील 223 बंधारा पैकी 140 बंधारे ओव्हर फ्लो झालेले होते. या दृष्टी मुळे जिल्ह्यातील 118 जनावरे वाहून गेले असून 84 घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे तसेच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अतिवृष्टी व पुरामुळे अडकलेल्या 126 नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी देऊन यापूर्वीच प्रशासनाला व विमा कंपनीला शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख,राज्यमंत्री संजय बनसोडे, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर,  आ. ज्ञानराज चौगुले, आ. विक्रम काळे, राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, सुरेश बिराजदार, माजी आ. मधुकरराव चव्हाण, राहुल मोटे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, उमरगा उपविभागीय अधिकारी उमेश उदमले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे, कृषी विकास अधिकारी डॉ. टी.जे. चिमणशेटे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. शरद पवार म्हणाले की, शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, आडवा ऊस पडल्यामुळे त्याची विल्हेवाट लावता येणार नाही. कारण तोडणी सुरू केली तरी ऊस वाहतूक करण्यासाठी रस्ते नाहीत. माती वाहून गेल्यामुळे एका वर्षाचे नुकसान झाले नसून या संकटाला तोंड देऊ या असे आवाहन करून ते म्हणाले की, अशा अस्मानी संकटाच्या काळात राज्य सरकार तर निश्चितच मदत करील. मात्र या मदतीसाठी राज्यावर मर्यादा असल्यामुळे केंद्र सरकारने देखील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे.   त्यासाठी मंत्रीमंडळाची बैठक घेण्यात येणार असून  पुढील दहा दिवसात दिल्लीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन याबाबत भरीव मदतीची मागणी  करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या उद्भभवलेल्या परिस्थितीमुळे जे अतोनात नुकसान झाले आहे ते भरपाई देण्यासाठी राज्याचे कायमस्वरूपी धोरण ठरवावे लागेल ? तसेच पीक, जमीन, गुर-ढोर, घर व घरातील सामान वाहून गेले आहे. त्याची नुकसान भरपाई तुमच्या पदरात टाकली जाईल असे 
आश्वासन देऊन ते म्हणाले की, भूकंपाच्या वेळी हजारो माणसे गेली त्या संकटावर  आपण मात केली आहे. तशीच मात या संकटावर ही  करा असे भावनिक आवाहन देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. 
यावेळी जीवनराव गोरे म्हणाले की, भूकंपावेळी ज्याप्रकारे आपले पुनर्वसन केले त्याच धरतीवर यावेळी शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. तसेच जलसंधारणाचे बांध वाहून गेल्यामुळे त्यासाठी विशेष निधी द्यावा शेती वाहून गेल्यामुळे ते दुरूस्त करण्यासाठी विशेष निधी दयावा, आमदार चौगुले म्हणाले की शेतकर्‍यांना जीवदान देण्यासाठी शासनाने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा नदी पात्रात नुकसान झालेल्या शेतीची व पिकांची तर सास्तूर चौक, लोहारा व लोहारा खुर्द,माकणी, सास्तुर शिवार, एकोंडी (लो), राजेगाव, कवठा (खु), औसा तालुक्यातील आशिव, उजनी व उस्मानाबाद तालुक्यातील पाटोदा व करजखेडा या ठिकाणी नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी व शेतकऱ्यांशी नुकसानीबाबत संवाद साधत त्यांची निवेदने देऊन त्यांना धीर दिला.
पाहणी दौऱ्यानंतर खा.शरद पवार यांनी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली त्यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे,खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. विक्रम काळे, राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, सुरेश बिराजदार, माजी आ. राहुल मोटे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले की, मागील तीन-चार दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी 163 मिलिमीटर पाऊस झाल्याचे सांगून उमरगा तालुक्यात मागील पाच दिवसात 235 मिलिमीटर तर लोहारा तालुक्यात 200, तुळजापूर तालुक्यात 212 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील 42 महसूल मंडळापैकी 15 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली असून उर्वरित महसूल मंडळात पूर परिस्थितीमुळे पिके वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. 
     तसेच जिल्ह्यातील 223 बंधाऱ्या पैकी 140 बंधारे ओव्हर फ्लो झालेले होते. या अतिवृष्टी मुळे जिल्ह्यातील 118 जनावरे वाहून गेली असून 84 घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अतिवृष्टी व पुरामुळे अडकलेल्या 126 नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी देऊन यापूर्वीच प्रशासनाला व विमा कंपनीला शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

 
Top