Views






*सर्व शक्तीपणाला लावून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 मी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला आलो  असून या भागातील शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी खचलेले आहेत. शेतकऱ्यांनी खचून न जाता त्यांनी धीर धरावा. सरकार म्हणून आम्ही सर्व शक्तीपणाला  लावून त्यांना मदत करून पुन्हा उभे करणार असल्याचा  विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांशी संवाद साधताना दिला. तुळजापूर तालुक्यातील कात्री या गावी अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची व खरडून वाहून गेलेल्या जमिनीची दि.21 ऑक्टोबर रोजी ठाकरे यांच्यासह इतर मान्यवरांनी पाहणी केली आणि  गावातील शेतकऱ्यांशी ग्रामपंचायतच्या प्रागंणात  संवाद साधुन त्यांची आसवे पुसत त्यांना धीर दिला. यावेळी  राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे,खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.राणाजगजितसिंह पाटील,आ.कैलास घाडगे-पाटील,आ. ज्ञानराज चौगुले, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,  कात्रीचे सरपंच किशोर गोडगिरे, अपसिंगाचे सरपंच वैशाली गोरे, उपसरपंच दिपक सोनवणे आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, सद्या ताबडतोबीने काय करायचे ? आम्ही  या भागातील कुठून व कशा प्रकारचे नुकसान झाले आहे हे पाहीले असल्यामुळे  एकही नुकसानग्रस्त शेतकरी पीक नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही यासाठी व्यवस्थीतरित्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर असून निश्चितपणे शेतकऱ्यांना मदत करेल असे आश्वासनही  त्यांनी दिले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले. यामध्ये अपसिंगा येथील अर्चना युवराज पाटील, सुवर्णा लोके, हिराबाई दत्तु कटकधोंड यांना तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येकी  30 हजार रूपयांचे धनादेश देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मुख्यमत्रयासह सर्व मंत्री महोदयांनी अपसिंगा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
 
Top