Views


*स्वखर्चाने बोअर पाडून गावकऱ्यांना सुरू केला पाणी पुरवठा, निवडणुकीत दिलेला शब्द २१ वर्षीय युवकाने पाळला*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
 कोणतीही निवडणूक असो निवडून येण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत नेते मंडळी वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने दाखविण्या बरोबरच मोठ-मोठी आश्वासने देतात. मात्र तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथील एका २१ वर्षीय युवकाने सतत पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावकऱ्यांना निवडून आलो तर वस्तीमध्ये बोर पाडून देईन असे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्षात कृती करून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना स्वखर्चाने बोअर पाडून पंप बसवून पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे नागरिक देखील सुखावले असून असाच लोकसेवक असावा अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते खासदार निवडणुकीसाठी प्रत्येकजण कोणत्याही प्रकारे आपण निवडून आलेच पाहिजे यासाठी साम-दाम-दंड-भेद या सर्व आयुधांचा वापर करीत असतो. तसेच जनतेला वेगवेगळी प्रलोभने दाखविण्या बरोबरच मोठमोठी आश्वासने देखील देण्याच्या सपाटा लावला जातो. निवडणूक संपल्यानंतर सदरील आश्वासनाकडे सपशेल पाठ फिरवली जाते. परंतू या प्रकारास तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव ग्रामपंचायतचे २१ वर्षीय तरुण सदस्य प्रल्हाद माणिक गुंड यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. सुरतगाव येथील वडार वस्ती भागात गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी सतत भटकंती करावी लागत होती. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान प्रल्‍हाद गुंड यांनी या भागात आपला उमेदवारी अर्ज दाखल करून या भागातील नागरिकांना तुम्ही मला निवडून दिले तर मी स्वखर्चाने तुमची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविन असे आश्वासन दिले होते. या भागातील नागरिकांनी देखील गुंड यांना मतदान करून निवडून दिले. जानेवारीमध्ये मतदान प्रक्रिया संपताच गुंड यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये या वस्तीत बोअर पाडून त्यावर मोटर पंप बसवून या भागात मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे दरवर्षी रखरखत्या उन्हात पाण्याच्या समस्येला तोंड देत असलेल्या वडार वस्तीतील नागरीकांची समस्या सुटली आहे.
----------------------------------------------------------------------
मी स्वतःच्या जागेत बोअर पाडून या वस्तीला पाणी पुरवठा सुरु केला आहे. शासनाने पाणी साठा करण्यासाठी ५ हजार लिटरच्या दोन टाक्या व दोन पाइप बसवून द्यावेत. तसेच या बोअरला मुबलक पाणी असल्यामुळे १० ते १२ तास‌ बोअर सुरू असते. ते पाणी संपूर्ण गावाला पुरवठा होऊ शकतो. त्यामुळे शासनाने या गावात कुठल्याही बोअर किंवा विहिरीचे अधिग्रहण न करता या बोअरचे पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया राबवावी व गावकऱ्यांची दरवर्षी होणारी भटकंती थांबवावी एवढीच माफक अपेक्षा ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद माणिक गुंड यांनी व्यक्त केली.
 
Top